
मुंबई महाराष्ट्र :- शिवसेनेच्या स्थापनेपासून अखेरपर्यंत कार्यरत असलेले आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले, एक खंबीर, विचारी आणि शिस्तबध्द नेतृत्व मनोहर जोशी यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आहे. बाळासाहेबांचा आदेश शिरोधार्य मानून पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. नगरसेवक, मुंबईचे महापौरपद, आमदार, विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यानंतर नव्वदच्या दशकात राज्यात प्रथमच भाजपसोबत सत्तेत आलेल्या युती सरकारचे मुख्यमंत्रीपद आणि पुढे लोकसभेचे सभापती अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. शिवसेना पक्षाची संघटना वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
मनोहर जोशी हे मूळचे बीडचे. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. 1995 साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले. पण गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.